मोर्शी (अमरावती) : भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
खुले कारागृह स्थापन झाल्यापासून २००८पासून सलग १०व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हातून गुन्हा घडल्याने घरापासून, समाजापासून दूर गेलेल्या तुरुंगातील कैद्यांना नात्या-गोत्याचा काय संबंध, अशी भावना समाजात आहे; पण मोर्शी येथील खुल्या कारागृहातील बंदिवानांसाठी एक अभिनव रक्षाबंधन पार पडले. कारागृहातील १५१ पुरुष कैद्यांना राखी बांधण्यात आली. या उपक्रमात स्थानिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही सहभाग घेतला.
गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षा भोगत असणारे कैदी या कारागृहात आहेत. कुणी खुनाच्या गुन्ह्यात, तर कुणी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. घरापासून व समाजापासून तुटलेल्या या कैद्यांना मानवतेचा दृष्टिकोन ठेवून येथे असे उपक्रम राबविले जातात. कित्येक वर्षांपासून घरी न गेलेले तुरुंगातील कैदी या अभिनव उपक्रमाने चांगलेच भारावले आहेत. या वेळी मिठाईचे वाटप करण्यात आले.
तब्बल १५१ कैद्यांनी हातावर राखी बांधलेली मनगटे उंचावत ‘आता ही मनगटे उठतील तर चांगल्या कामासाठीच,’ अशी शपथ घेतली. खुले कारागृह अधीक्षक ए. व्ही. मलवाड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एस. बी. बिजवे, प्रा. व्ही. व्ही. खांडेकर, गणेश राऊत, सुरेंद्र ठाकरे, प्रवीण मोडकर, प्रा. डॉ. एल. आर. टेंभुर्णे, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप राऊत, प्रा. दीपक काळे, डॉ. भैया चिखले, प्रा. एम. आर. वाहने, रूपेश वाळके, एस. बी. राठोड, राहुल हगवणे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा. डॉ. संदीप राऊत यांनी केले. डॉ. एल. आर. टेंभुर्णे यांनी आभार मानले.